नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांमध्ये बऱ्याच इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. या वाहनासाठी लागणाऱ्या बॅटरी सेल्सची परदेशात निर्मिती केली जाते. मात्र या सेल्स भारतातील वातावरणात योग्य रित्या काम करू शकत नाहीत. त्यामुळ बॅटरी सेल्स भारतात तयार करण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची गरज असल्याचे नीती आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ वैज्ञानिक व्ही. के सारस्वत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही इलेक्ट्रिक वाहनांना आग लागत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ज्या वाहनांना आग लागण्याची शक्यता आहे अशी वाहने या कंपन्यांनी ताबडतोब परत मागवावी अशी सूचना त्यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या वाहनांना आगी लागल्या त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.
या समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार त्या आधारावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्यानंतर या आगीत बरेच लोक जखमी झाले आहेत. त्याचबरोबर काही लोक मृत्युमुखी पडले आहेत.
जीवीत हाणीबद्दल सरकार कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही असे अवजड उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोलताना सारस्वत यांनी सांगितले की, बॅटरी तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान आहे. त्यामुळे ते भारतातच नाही तर जगभरात विकसित होत आहे.
त्याचबरोबर भारतामध्ये अशा बॅटरीचे निर्मिती केली जात नाही. परदेशामध्ये तेथील परिस्थितीनुसार बॅटरीची निर्मिती केली जाते. त्यामुळे त्या बॅटऱ्या भारतीय वाहनात वापरल्यानंतर आगी लागण्याची शक्यता आहे का या विषयावर चौकशी केली जात आहे. भारतामध्ये तापमान जास्त असते. मात्र या बॅटऱ्या ज्या देशांमध्ये तयार केले जातात तेथील तापमान कमी असते.
या दृष्टिकोनातून या विषयावर विचार केला जात आहे.
भारत सरकारने देशातील इलेक्ट्रिक वाहनाची संख्या वाढविण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण तयार केले आहे. मात्र अशा प्रकारचे अपघात घडल्यानंतर भारताच्या या मोहीमेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर कंपन्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले तर अशा कंपन्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे गडकरी यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे.