लोणंद : लोणंद शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी पोलीस व प्रशासन करत आहे. घरपोच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. परंतु याचा फटका सकाळी भाजीपाला व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. दूध व भाजीपाला हा नाशवंत माल ग्राहकांपर्यंत पोहोचवताना शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सकाळी घरोघरी दुधाचे रतीब घालणारे शेतकरीही पोलिसांच्या अडवणुकीमुळे संकटात सापडले आहेत. याउलट 11 वाजल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त तितकासा कडक नसल्याने मोकाट फिरणारंना मोकळे रान मिळत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पर्याय शोधला पाहिजे. लोणंदमधील अनेक नागरिक शेतकऱ्यांकडून रतीबाने दूध घेतात. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे शेतकऱ्यांना सध्या दूध घालणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवकांमार्फत दूध व भाजीपाला एका ठिकाणी संकलित करून वितरणाची व्यवस्था करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया माजी सैनिक व शेतकरी म्हस्कूअण्णा शेळके यांनी व्यक्त केली.