सातारा – करोनाला रोखण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामधील करोना नियंत्रण कक्षाच्यावतीने सर्दी, ताप,खोकला आदी लक्षणे असलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येणाऱ्या संशयितांवर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
करोना व “सारी’च्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना करोना नियंत्रण कक्ष नागरिकांना आधार देण्याचे काम करत आहे.करोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. करोनाचा प्रादुर्भाव संसर्गाने होत असल्याने नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती केली जात आहे. अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक यांच्यावतीने गावोगावी सर्वेक्षण युध्दपातळीवर सुरु आहे.
नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने करोनाबाबत जनजागृतीसाठी अनेक पुस्तके, घडीपत्रकांचे गावोगावी वाटप झाले आहे. मात्र, दिवसेंदिवस करोनाबाधितांचा वाढता आकडा ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे.
नागरिक भयमुक्त व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये दि. 5 एप्रिलपासून करोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. गावोगावी अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका संशयित रुग्णांच्या घरोघरातील व्यक्तींची माहिती घेत आहेत.
सर्दी, ताप, कोरडा खोकला आदी लक्षणे तसेच इतर कोणता गंभीर आजार आहे का याची माहिती घेत आहेत. प्रशासन आपल्या हितासाठीच माहिती घेत असल्याने नागरिकही माहिती शक्यतो लपवत नाहीत. ही माहिती आशा स्वयंसेविकांकडील ऍपवर भरण्यात येत असून रोज ती करोना नियंत्रण कक्षात संकलित होत आहे.
प्रत्येक तालुक्यासाठी एक सुपरवायझरच्या नियंत्रणाखाली हे काम होत आहे. करोना नियंत्रण कक्षातही अकरा तालुक्यांसाठी 11 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. दररोज सायंकाळपर्यंत माहिती संकलित होते. नियंत्रण कक्षातील संबंधित तालुक्याचे प्रतिनिधी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोबाईलवर संपर्क साधून लोकांना लक्षणे, होणारा त्रास, परदेशातून आलेल्या कोणाशी संपर्क आला होता का आदी प्रश्नांची माहिती घेत आहेत. गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळणाऱ्याशी वैद्यकीय अधिकारी संपर्क साधून त्यांचे समपुदेशन करत आहेत. ज्या रुग्णांबाबत शंका वाटत असेल अशा रुग्णांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जात आहे.
करोना नियंत्रण कक्षातून योग्य माहिती देण्यात येत असल्यामुळे नागरिकांचीही भीती कमी होताना दिसत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुणालयांबरोबर आता खासगी रुग्णालयेही करोनाच्या लढ्यात हातात हात घालून काम करत आहेत. सुमारे पाच हजार नागरिकांची माहिती खासगी रुग्णालयांकडून नियंत्रण कक्षाला मिळाली असून त्यांचेही समुपदेशन करुन त्यांना योग्य सल्ला देण्यात आला आहे.
मनोबल वाढण्यास होतेय मदत
करोना नियंत्रण कक्षाकडे ऍपद्वारे संकलित झालेल्या सुमारे आठ हजार नागरिकांशी नियंत्रण कक्षातील तालुक्यों प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी संवाद साधत आहेत. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन काहीही माहिती नागरिकांनी लपवून ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. करोना संशयिताचे नाव जाहीर होत नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्य माहिती सांगून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आठ हजार नागरिकांशी साधला संवाद
लॉकडाऊनमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असल्याने नागरिकांना घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. दिवसभर घरात बसून मानसिक दडपण येत आहे. करोना, सारी या आजारांची धास्ती आहे. अशा संकटाच्या काळात जिल्हा परिषदेतील करोना नियंत्रण कक्षातून नागरिकांना थेट संपर्क साधण्यात येत असल्याने आपण एकटे नसल्याबाबतची भावना निर्माण होत आहे. नागरिकांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होऊन त्यांचे मनोबल वाढत आहे.