पुणे – दरवर्षी जल्लोषात होळीचा उत्सव साजरा होतो. यंदा रविवारी होळी पौर्णिमा आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे भान ठेवत साधेपणाने होळी साजरी करण्याचे आवाहन सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.
याप्रसंगी घरोघरी आणि गावांमध्ये एकत्रितपणे शेणाच्या गोवऱ्या रचून होळी पेटवली जाते. यावेळी होळीची पूजा करून, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. यानिमित्त विविध ठिकाणी पालखीचेही आयोजन केले जाते. पुराणकथांच्या अनुसार वाईट गुणांचे दहन यानिमित्ताने होते, असे सांगितले जाते.
लहान मुले डफ, टिमकी अशी वाद्ये वाजवत होळीच्या अवतीभोवती बागडत असतात.
अतिशय उत्साही वातावरणात होळी साजरी केली जाते. त्यापाठोपाठ येणाऱ्या धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी लहान-मोठे अशा सर्वच वर्गातील नागरिक अतिशय उत्सुक असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी या उत्साहावर विरजण पडले होते.
यंदाही तीच परिस्थिती उदभविण्याची चिन्हे दिसत असून, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सार्वजनिक उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे.
बाजारपेठा शांतच
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा सजतात. गोवऱ्या, धुलीवंदनानिमित्त रंग, पिचकाऱ्या आदींची बाजारपेठांमध्ये रेलचेल असते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा शांत आहेत. यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.
शहरासहित राज्यातील बहुतांश भागांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने वाढ असल्याने एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे या सुरक्षा नियमांचे पालन करावे. साधेपणाने होळी साजरी करावी.
– पंडित वसंतराव गाडगीळ