लखनौ – मोदींची पाच वर्षाची राजवट लोकविरोधी होती. त्यामुळे हे जनविरोधी सरकार पुन्हा सत्तेवर यावे असे जनतेला वाटत नाही असा दावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. त्यांच्या घोषणा म्हणजे केवळ हवाहवाई स्वरूपाच्या होत्या. त्यांनी लोकांना हातोहात फसवले. खोटी आकडेवारी सादर करून त्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. मोदी सरकार म्हणजे खोटारडेपणा आणि नाटकीपणाचा कळस होता असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते एक नंबरचे जुमलेबाज नेते आहेत त्यांच्या काळात केवळ श्रीमंतांचाच विकास झाला.
केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असताना उत्तरप्रदेशचा कोणता प्रश्न सुटला असा सवाल त्यांनी केला. उत्तरप्रदेशचे मागासलेपण संपले नाहीं. रोजगाराचा व गरीबीचा प्रश्न सुटला नाही. लोकांना दिलेल्या भरमसाठ आश्वासनांमुळे त्यांनी लोकांचा विश्वास गमावला असून लोकांच्या डोळ्यांनाडोळा भिडवून त्यांना उत्तर देण्याची मोदींची हिमंत आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कायम दुसऱ्यांच्या चुका काढून पळवाटा शोधणाऱ्या या सरकारने कधी स्वताच्या सरकारचे आत्मपरिक्षण केले आहे काय असा सवालही त्यांनी केला आहे.