नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी देशाची अर्थव्यवस्था रूळांवरून घसरल्याची विरोधकांकडून होणारी टीका फेटाळून लावली आहे. अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना त्यांनी अचंबित करणारे तर्क मांडले आहेत. लोक लग्न करत आहेत. विमानतळं आणि रेल्वे फुल आहेत, असे म्हणत त्यांनी आर्थिक आघाडीवर सर्व काही आलबेल असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटकमधील भाजपचे नेते असणाऱ्या अंगडी यांना शुक्रवारी येथील एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी अर्थव्यवस्थेविषयी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी विरोधकांची टीका फेटाळली. काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी टीका करत आहेत. दर तीन वर्षांनी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. मात्र, नंतर ती उभारीही घेते, असे ते म्हणाले.