नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणात फ्रान्सच्या अध्यक्षांनीही इस्त्रायलच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. पण केवळ भारत सरकारच असे एकमेव सरकार आहे ज्यांना या विषयाची कसलीच चिंता दिसत नाही, असा टोमणा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मारला आहे.
फ्रान्सच्या अध्यक्षांनी इस्रायली पंतप्रधानांशी संपर्क साधून पेगॅसस प्रकरणात पुर्ण माहिती त्यांच्याकडून मागवली आहे. त्यावर निर्णायक तपास करून आपल्याला माहिती दिली जाईल, अशी ग्वाही इस्रायलकडून त्यांना देण्यात आल्याची बातमीही प्रसारित झाली आहे.
भारत सरकारला मात्र या प्रकरणात कोणतीही चौकशी करण्याची गरज वाटत नाही की त्यांना त्याची कोणतीही चिंता दिसत नाही. याचा एकच अर्थ होऊ शकतो, तो म्हणजे भारतात हे सॉफ्टवेअर वापरून हेरगिरी केली गेली आहे ही बाब भारत सरकारला पूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची भारत सरकारला काहीही गरज वाटत नसावी.
पेगॅससची यंत्रणा वापरून भारतात हेरगिरी केली गेली आहे की नाही याविषयी पंतप्रधानांनीच संसदेत निवेदन करून खुलासा केला पाहिजे, अशी मागणीही चिदंबरम यांनी केली.