तहसीलदार, ग्रामपंचायतींनी सुविधा पुरवण्याचे आदेश
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मजुरांचे राष्ट्रीय महामार्गांवरुन पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा, जेवण, शौचालय अशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पुणे जिल्ह्यातील बंगळुरू, सोलापूर, नगर, मुंबई आणि नाशिक या महामार्गावर संबंधित तहसीलदार यांच्याकडील राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मजुरांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
या महामार्गावर ठराविक अंतरावर आवश्यकतेप्रमाणे विविध टप्प्यावर उपलब्ध असलेले मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सोय करण्यात यावी, तसेच या विश्रांतीगृहाचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी यांच्या शिफारशीने तहसीलदार यांचेकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत सादर करावयाचा असून त्यास तहसीलदार यांनी तात्काळ मान्यता द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.