हिंजवडी – शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून नाना नवलेंच्या नेतृत्वाखाली श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन चांगले काम करत आहे. परंतु स्पर्धेच्या युगात जर खासगी कारखाने उसाला प्रति मे. टन तीन हजारांपेक्षा अधिकचा दर देत असतील तर सहकारी तत्त्वावर चाललेल्या संत तुकाराम साखर कारखान्याने देखील उसाला 3000 चा दर दिला पाहिजे, अशी अपेक्षा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 26 वा गळीत हंगाम शांतिब्रह्म गुरुवर्य हभप मारोती महाराज कुऱ्हेकर व युवा कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे यांच्या हस्ते झाला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यंदाचा गळीत हंगाम सुरू होणार होता. परंतु डेंगीच्या आजाराने ते बाधित असल्याने अजित पवार येऊ शकले नसल्याने त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, विलास लांडे, माजी मंत्री बाळा भेगडे, बबनराव भेगडे, बाळासाहेब काशीद, पीडीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महादेव कोंढरे, स्वाती हुलावळे, कुंदा विनोदे, राजाभाऊ हगवणे, पुरुषोत्तम मोरे, सुरेश हुलावळे, वसंत साखरे यांच्यासह मुळशी मावळ खेड हवेली शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याची जडण घडण व राबविलेल्या सह प्रकल्पांचा आढावा कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी प्रास्तविक करताना घेतला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तद्नंतर गव्हाणीत मोळी टाकून 26 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
संचालक बाळासाहेब विनोदे, दिलीप दगडे, अंकुश उभे, बाळासाहेब बावकर, चेतन भुजबळ, प्रवीण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, सुभाष राक्षे, नरेंद्र ठाकर, शुभांगी गायकवाड, स्वाती भेगडे, तज्ज्ञ संचालक ज्ञानेश नवले व सुभाष जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानिमित झालेल्या सभेत बोलताना कुऱ्हेकर महाराज म्हणाले, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत तुकोबारायांच्या नावाने सुरू केलेला कारखाना असाच निरंतर चालू राहो.
बाळा भेगडे म्हणाले, मावळ मुळशीच्या शेतकऱ्यांसाठी हा कारखाना एक मंदिर आहे. ज्याप्रमाणे सर्वपक्षीय नेते एकत्र करून नाना कारभार चालवतात त्याप्रमाणे आगामी काळात त्यांचा वसा व विचार जोपासण्याचे काम आम्ही मंडळी करू. संत तुकाराम एफआरपी प्रमाणे 2634 चा दर न देता शेतकऱ्यांच्या हितासाठी व 2834 हा चांगला दर देतात. या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक तुळशीदास घोलप यांनी केले. कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे व शंकरराव शेलार यांनी आभार मानले.
संत तुकाराम महाराजांच्या भूमीत जन्मलो हे आपले भाग्य आहे. तुकोबांच्या भक्तीची निष्ठा असल्याने संचालक मंडळ कुठलाही भत्ता न घेता प्रामाणिक काम करतात. इथे नांदे तया ठायी दैवत पंढरीचे!! या उक्तीप्रमाणे तुकोबांच्या नावामुळे कारखान्याला अपयश नाही.
– नानासाहेब नवले, संस्थापक अध्यक्ष.