ज्येष्ठ नेते दशरथ माने यांची माहिती
रेडा- राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर मित्र पक्ष यांची नवी आघाडी करून नवी समिकरणे घडवून आणावीत, अशी मागणी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत मागणी पोहचविणार आहोत, असे सोनाई परिवाराचे प्रमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दशरथ माने यांनी सांगितले.
इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात इंदापूर विधानसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विजयी सभेत माने बोलत होते. यावेळी जि.प.चे सभापती प्रवीण माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, रत्नाकर मखरे, संजय सोनवणे, अमोल पाटील, संतोष राजगुरू, शिवाजीराव इजगुडे, डी एन.जगताप, प्रतापराव पाटील, सचिन सपकळ, रणजीत निंबाळकर, विक्रम निंबाळकर, श्रीधर बाब्रस, अभिजीत रणवरे पाटील, वीरसिंह रणसिंग, तात्यासाहेब वडापुरे, महारुद्र पाटील, हामा पाटील, अनिल काळे, शुभम निंबाळकर, बबनराव खराडे, संतोष भोसले, सागर मिसाळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
माने म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्याला विकास करण्यासाठी शब्द दिला तरी देखील येथील जनतेला तो मान्य झाला नाही. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती; त्यामुळे आमदार भरणे यांचा विजय झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यामध्ये अत्यंत जबाबदारीने काम केल्यामुळे पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निवडून आले आहेत, असेही माने यांनी सांगितले.
आमदार भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील मोठी माणसे एकीकडे होती व सामान्य माणसे एकीकडे होती. मात्र, सामान्य माणसाने मनात घेतलं आणि मोठ्या माणसांचे काय केले, हे मतपेटीतून दाखवून दिले. धमक्यांना, दबावाला घाबरणारा इंदापूर तालुका नाही, हे चोख उत्तर मतदारांनी दिले आहे. पुढील पाच वर्षात सामान्य जनतेचे कामच करीत राहणार, अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली.