राजगुरूनगर -देशभक्ती शिकवायची नसते ती जगायची असते, तर देशभक्ती सांगून नाही तर जागवून दाखवायची असते, असे प्रतिपादन “सरहद्द व वंदे मातरम’ संघटनेचे अध्यक्ष संजय नहार यांनी राजगुरूनगर येथे केले.
हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने राजगुरूनगर येथे त्यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काश्मिरी युवक तथा सरहद्द संस्थेचा विद्यार्थी जहीर बट याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी काश्मिरी युवकांसमवेत हुतात्मा राजगुरू यांचे पुतणे सत्यशील राजगुरू, उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, नायब तहसीलदार राजेश काणसकर, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, सरहद्द संस्थेतील काश्मिरी तरुण, सर्व नगरसेवक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
संजय नहार म्हणाले की, हुतात्मा भगतसिंग यांना राजगुरू यांच्या पासून आणि राजगुरू यांना सुखदेव यांच्यापासून वेगळे करण्याची मोठी प्रकिया सुरु झाली आहे. आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन केले. जे जगताना एकत्र होते, जे फाशीवर जाताना एकत्र होते आणि हुतात्माही एकत्र झाले. त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे. याबरोबरच देशातील राज्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. देशात भित्री जमात आली आहे. बॉम्ब ठेवायचे आणि निघून जायचे, अशा लोकांच्या विरोधात आगामी काळात आपल्याला सामना करायचा आहे. सगळे मिळून देश उभा करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांना अभिवादन
राजगुरूनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग सुखदेव या स्मृतिशिल्प स्थळातील हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुतळ्यास आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी उदय जाधव, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र जाधव, माजी आमदार दिलीप मोहिते, हुतात्मा राजगुरू ट्रस्टचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, शिवसेनेच्या नेत्या विजया शिंदे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, गणेश सांडभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामदास ठाकूर, किरण मांजरे, देवेंद्र बुट्टे पाटील, मुकुंद आवटे, सुभद्रा शिंदे, अंकुश राक्षे सर्व नगरसेवक विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.