- दक्षता महत्त्वाची ः रुग्णांमध्ये जाणवतोय कमालीचा अशक्तपणा
- काही रुग्णांमध्ये पुन्हा जाणवताहेत लक्षणे
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील 76 हजार 763 नागरिक करोनामुक्त झाले आहेत. यापैकी काही जणांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व अशक्तपणा येत असल्याने त्यांना उपचार व मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामध्येच वातावरणात सतत बदल होत असल्याने अन्य आजारांचीही भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढत आहे.
शहरात मार्च माहिन्यामध्ये करोनाचे पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर सहा महिन्यामध्ये 82 हजार 503 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी 49 हजारांहून अधिक रुग्ण जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या तीन महिन्यातील आहे. करोनाचा उद्रेक या तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला. सद्यस्थितीत रुग्णांची नोंद कमी होत आहे. लक्षणे नसलेली रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर ज्यांच्यामध्ये तीव्र लक्षणे आहेत अशा 2 हजार रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
तसेच 10 दिवसाऐवजी सात ते आठ दिवसांत तपासणीअंती रुग्णाला घरी सोडले जात आहे. गृह विलगीकरणाच्या 14 दिवसांत त्यांच्यावर कुठल्याही यंत्रणेचे वॉच नसल्याचे वास्तव आहे. काही व्यक्ती डिस्चार्ज मिळाला म्हणजे संक्रमणमुक्त झाल्याचे समजून सर्व बंधने झुगारत आहे. शहरात संक्रमितांची संख्या कमी होत असली तरी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणे जाणवू लागली आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी व अशक्तपणाचा त्रास झाल्याने काहीजण पुन्हा रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. डिस्चार्जनंतर सतर्कता व दक्षता न बाळगल्यास संक्रमण पुन्हा होऊ शकते.
गृह विलगीकरणातील रुग्णांकडे दुर्लक्ष
शहरात 1 हजारांवर रुग्णांनी होम आयसोलेशनची सुविधा घेतली आहे. त्यांना दिवसभरात दोन वेळा फोन करत असल्याचा दाव प्रशासन करत आहे. मात्र 14 दिवसांच्या कालावधीत एक ते दोन वेळाच रुग्णांना फोन गेला असल्याची उदाहरणे आहेत. फक्त एखाद वेळेसच फोन करण्याची खबरदारी पालिका घेत आहे. होम क्वांरटाईन रुग्णांबाबत तर एवढीही फुरसत आरोग्य यंत्रणेला नाही. या दोन्ही प्रकारातील रुग्ण घराबाहेर सर्रास फिरत आहेत.
असे आहेत डिस्चार्जचे दिवस
संसर्गाच्या सुरुवातीला रुग्णांना 14 दिवस रुग्णालयात उपचार व निरीक्षणात ठेवण्यात येत होते. त्यानंतर सलग दोन नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला जात होता. त्यासाठी काही रुग्णांना जास्त काललावधी लागत असे. मध्यंतरी रुग्णसंख्या वाढू लागल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांना सात ते आठ दिवसांत घरी सोडण्यात येत असे. आताही रुग्णांना सात ते आठ दिवसांत घरी सोडले जात आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
ही काळजी आवश्यक
गृह विलगीकरणात असताना रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण व हृदयाचे ठोके तपासणे, रक्त पातळ होण्याची औषधे डॉक्टराच्या सल्ल्याने घेणे, शारीरिक व श्वसनाचे व्यायाम नियमित करणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे. प्रथिनयुक्त, पोषक आहार घेणे, जेवण व झोपेच्या वेळा पाळणे. कुठलाही त्रास झाल्यास किंवा लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा फॅमिली डॉक्टरांना दाखविणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
आठवड्यामध्ये एक-दोन असे रुग्ण येत आहेत. ज्यांना पुन्हा लक्षणे जाणवायला लागली आहेत. सर्दी, खोकला किंवा अशक्तपणा येत आहे. यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. रुग्णांना डिस्चार्ज मिळून घऱी गेल्यानंतर ते व्यवस्थित काळजी घेत नाहीत. अतिरिक्त चिडचिड करत राहतात. तसेच व्यर्थची काळजी करतात. त्यामुळे जेवण न जाणे, झोप न लागणे असे प्रकार होतात. त्याचा परिणाम प्रकृतीवर होत आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णांमध्ये लक्षणे जाणवू लागली आहेत.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय