मुंबई – फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेले आणि बहुसंख्य भारतीय प्रवासी असलेले रोमानियाच्या विमान कंपनीचे विमान आज पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये दाखल झाले. या सर्व प्रवाशांना फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी परत पाठवले आहे.
दुबईवरून निरुगुआला जात असलेले लिजंड एअरलाईन्सचे हे विमान मानवी तस्करी होत असल्याच्या संशयावरून फ्रान्सला थांबवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर पडत असताना या प्रवाशांनी प्रसिद्धी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. माध्यमांच्या कोणत्याच प्रश्नांना या प्रवाशांनी उत्तरे दिली नाहीत.
काल संध्याकाळी या विमानाला मुंबईला जाण्याची अनुमती फ्रान्सच्या न्यायालयाने दिली होती. त्यानुसार विमान मुंबईकडे रवाना झाल्यावर भारतीय दूतावासाने फ्रान्स सरकारला आणि वेट्री विमानतळाच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था आणि प्राप्त परिस्थितीवर त्वरित तोडगा काढल्याबद्दल धन्यवाद दिले होते. फ्रान्समधील दूतावासाच्या फ्रेंच कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
प्रवाशांची सीआयएसएफकडून चौकशी
फ्रान्सवरून आलेल्या सर्व प्रवाशांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून चौकशी करण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांवर मानवी तस्करीच्या प्रकरणात कथित सहभागी असल्याच्या संशयाने बघितले जात आहे. काही प्रवाशांची विमानतळावरच सीआयएसएफकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आले. मात्र अजूनही काही प्रवाशांची तौकशी केली जाते आहे. विमानातील काही प्रवाशांना फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी तेथेच थांबवून ठेवले आहे. मानवी तस्करी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. जे प्रवासी भारतात परत पाठवण्यात आले, ते बेकायदेशीर मार्गांनी मेक्सिकोमार्गे अमेरिकेमध्ये घुसण्याच्या तयारीने निघाले होते, असा संशय आहे.