– अरूण गोखले
मानला तर देव नाहीतर दगड असं आपण अगदी सहज बोलून जातो. पण जेव्हा तोच दगड आपल्या समोेर एखाद्या मूर्तीच्या, शिवपिंडीच्या, पादुकांच्या स्वरुपात पुढ्यात येतो तेव्हा मात्र आपण चटकन त्याच्या पायावर देवाची मूर्ती, शिवपिंड, देवाच्या पादुका म्हणून माथा टेकवितो.
पण हे असं त्या दगडाला देवत्व श्रेष्ठत्व येत असताना त्याला घडवताना किती त्रास पडतो, किती घाव घालावे आणि सोसावे लागतात, ते केवळ या दगडाला आणि त्याला देव मूर्तीत साकारणार्या मूर्तीकारालाच माहीत असते. वास्तविक तोसुद्धा इतर चार दगडांसारखाच. पण जेव्हा मूर्तीकार त्यातले काही गुण पारखून त्याची मूर्ती घडविण्यासाठी निवड करतो त्या ओबडधोबड दगडाला छान सुंदर मोहक असा आकार देतो.
त्यातूनच त्याच्या हस्तकौशल्याने चित्ताकर्षक देवमूर्ती ही त्याच्यातूनच आकाराला आणतो, तेव्हा त्या दगडालाही धन्यता वाटत असते आणि ती मूर्ती घडविणार्या त्या कसबी हातांनाही धन्यवाद द्यावे असे वाटते. कारण निराकारातून एखादा आकार साकार करायचा ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठीसुद्धा एक साधना, एक तप हे करावं लागतं. तिथेही चित्ताची एकाग्रता, समर्पणाचा भाव ठेवावाच लागतो. तेव्हाच देवाचा देव घडतो आणि मग माणूस त्या देवाच्या पायावर नतमस्तक होतो.कालचा दगड आज पूजनीय वंदनीय होतो.
हे जसं त्या दगडाचं तसंच माणसाचंही आहे. जी माणसं स्वत:ला घडवून घेत माणसाची देवमाणसं होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांनाही दगडासारखे अनेक घाव हे सोसावे लागतात. ही जडण-घडण तितकी सोपी नसते किंवा ती कोणा एकाच्या हातून घडत नसते. दगडाची मूर्ती हा एकटा मूर्तीकारच घडवतो.
पण माणसाचा मात्र देव माणूस घडताना त्यात त्याची माता पिता, शिक्षक, गुरू आणि शेवटी सद्गुरू तसेच समाज, परिस्थिती, त्याची प्रबळ इच्छा, त्यास मिळणारी प्रेरणा आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, सोसलेल्या कळा आणि झळा या सर्वांचा मोठा वाटा असतो. दगडातून मूर्ती घडविताना जसा त्यातला नको असणारा भाग काढून हवा असणारा आकार साकार केला जातो तसेच माणसाचा देवमाणूस घडवताना घडताना त्यालाही त्याच्यातील अनेक दोष दुर्गुण हे प्रयत्नपूर्वक दूर करून सद्गुण हे जोडून घ्यावे लागतात. दुर्गुणांचा त्याग आणि सद्गुणांचा स्वीकार करत गेलं तर माणसाचा देवमाणूस घडल्या शिवाय राहात नाही.