– अरुण गोखले
तुम्हाला जर कोणी विचारलं, की काय हो! तुम्ही कधी देवाशी संवाद करणारा माणूस पाहिला आहे का? तर, एक तर तुम्ही त्या माणसाला वेड्यात काढाल. पण तोच प्रश्न जर तुम्ही मला विचाराल? तर त्याच माझं उत्तर आहे ‘हो’. कारण दरवर्षी न चुकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी नानांच्या घरी त्यांच्या सोबत गणेश विसर्जनाला जायचं हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अलिखित असा नेम होता. पण पुढे नोकरीच्या निमित्याने माझे गाव बदलले आणि तो नेम तुटला. पण त्याची आठवण मात्र माझ्या मनात अजूनही घर करून आहे.
नाना एक मध्यम वर्गीय गृहस्थ. त्यांना माधव आणि शांता ही दोन मुलं. त्यांनी मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन तयार केलेले. शांता चांगल्या घरात सून म्हणून गेलेली. तर माधव हा नोकरीच्या निमित्याने परदेशी स्थायिक झालेला. त्यामुळे जीवनाच्या संध्याकाळीही नाना आणि नानी हे तसे एकटेच. त्यांचा परस्परांना काय होता तेवढाच आधार. या अशा परिस्थितीला सामोर जात असताना नानांच्या मनाला आधार होता तो केवळ त्याच्या मनातील ईश्वर निष्ठेचा. ती निष्ठा, ती भक्ती, ते समर्पण हेच त्यांचं मनोबल होतं. दु:ख देवाला सांगावे। सुख देवासी मागावे॥ हे त्यांच्या जणू अंगवळणीच पडलेलं. त्यांचा मूक संवाद चालायचा तो देवाशी, होय देवाशी.
तो नानांचा देवाशी चालणार संवाद ऐकायला. त्याचा तो देवास दिला जाणारा भावपूर्ण निरोप पाहायला आणि त्याच देवाकडे मागितलं जाणार ते मागणं ऐकायला मी नेहमी अनंत चतुर्दशीस मुद्दाम गणेश विसर्जनास त्यांना मदत करायला त्यांच्याकडे जायचो. यान्तु देवगणा: …असे म्हणून अक्षता टाकून विसर्जनासाठी ताटात काढलेला गणपती त्यांच्या समोर असतो. नानाचे हात जोडलेले, कंठ दाटलेला आणि डोेळे काठोकाठ भरलेले असतात. नाना त्या विघ्नहर्त्या गजाननास सांगत ‘हे देवा! तू आमच्या घरात आलास.
आमची वेडीवाकडी पूजा स्वीकारलीस.दिलेला नैवेद्य प्रेमाने ग्रहण केलास. आम्ही भरून पावलो. देवा तुझ्या पूजेत, भक्तीत जर आम्ही कुठे कमी पडलो असलो तर आम्हाला क्षमा कर. आमची चूक पदरात घाल. आम्हाला काय हवं नको ते तू जाणतोस, तेव्हा मागायचे ते काय? तूच अमुचे कल्याण कर’. हे सांगत असताना, त्यांच्या डोळ्यातील आसवांचा अभिषेक हातातील तबकातल्या विसर्जनाच्या मूर्तीवर होत असतो. तोच असतो त्यांचा देवाशी संवाद.