Parkash Ambedkar | Election Commission : देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी केली.
या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. लोकसभेबरोबरच चार राज्यांत विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. आजच्या घोषणेबरोबरच देशभर निवडणूक आचारसंहिताही लागू झाली आहे. ( Parkash Ambedkar | Election Commission )
आज जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुका १९ एप्रिल रोजी होतील, त्यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २७ मार्च अशी आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका २६ एप्रिल रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका ७ मे रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुका १३ मे रोजी होतील, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल अशी आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणुका २० मे रोजी होतील, उमेदवारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख ३ मे रोजी अशी आहे. सहाव्या टप्प्यातील निवडणुका २५ मे रोजी होतील, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख मे ६ अशी आहे. सातव्या टप्प्यातील निवडणुका १ जून रोजी होतील, त्यासाठी उमेदवारांच्या नामांकनाची अंतिम तारीख १४ मे अशी आहे.
दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात ना बर्फ पडत, ना हिंसा होत, मग पाच टप्प्यात मतदान कशासाठी? असा थेट सवालच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलं आहे. यावेळी ते म्हणाले, “मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे. मी आजपर्यंत निवडणूक काळात महाराष्ट्रात कुठेही गडबड झालेली पाहिली नाही. कुठे दंगा झालेला नाही.
एवढंच काय राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही. राज्यातील दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचं कारण काय? निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे’, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं.. ( Parkash Ambedkar | Election Commission )
महाराष्ट्रात कुठेही दळणवळणाची समस्या नाही. कुठेही बर्फ पडत नाही. कुठं पाऊस नाही. मग पाच टप्पे का? याच स्पष्टीकरण द्यावं. शांत महाराष्ट्र हा अशांत करायला इलेक्शन कमिशन निघालं आहे का?, असा सवाल करतानाच राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे हे आमचं म्हणणं आहे.
पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या आणि दुसऱ्या टप्प्यात 24 जागांसाठी मतदान घ्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्याची गरज नाही. आम्ही त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहोत. आमचं म्हणणं मांडणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ( Parkash Ambedkar | Election Commission )