मुंबई : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. शनिवारी पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती’ यात्रा बीडमधील पाटोदा येथे पोहोचली. तेव्हा पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती उत्सव सोहळ्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी, “मी घरी बसले नव्हते. तर, गढूळ परिस्थितीला वैतागले होते,” असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी घरी बसले नव्हते. गढूळ परिस्थितीला वैतागले होते. काही बोलायलं गेलं, तर दुसरंच चालवलं जायचं. माझ्या मागे बरेच प्रश्न होते. ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अडचणी आणि बरेच प्रश्न आहेत. जमेल तसे तेही प्रश्न सोडवू.” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यासोबतच “पंकजा मुंडे राजकारणात काय करेन, काय नाही करेन. पण, कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही. मी रणांगणात उतरले आहे. हे रन रखरखतं आहे. काहीजण मला ‘अहंकारी’ म्हणतात. मात्र, माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. मला तुमचा ( जनतेचा ) गर्व आहे,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.