जांबूत, (वार्ताहर)- पिंपरखेड ( ता. शिरूर) येथील दाभाडेवस्तीवर बुधवार (दि.३) रात्री आठच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सान्वी उमेश गायकवाड ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. प्रसंगावधान राखल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली ‘काळ आला होता, पण वेळ आली नाही, असा प्रत्यय गावकऱ्यांनी अनुभवला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अनेक वर्षांपासून बिबटप्रवण क्षेत्र असलेल्या दाभाडेमळा वस्तीवर रामदास मुरलीधर बोंबे यांची नात सान्वी उमेश गायकवाड (वय ९ ) ही रात्री घराबाहेर ओट्यावर आली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सान्वीवर झडप मारली. यावेळी ती खाली पडली. आवाज आल्याने जवळच असलेले संतोष खिलारी व लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. हल्ल्यात सान्वीच्या डाव्या हाताला दोन ठिकाणी, दोन्ही पायाच्या मांड्या व छातीवर नख्याची जखम झाली आहे.
हल्ल्यानंतर सान्वीला तत्काळ पिंपरखेड येथील डॉ. राम पोखरकर यांच्या श्रीराम क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी सान्वी हिला बिबट्याच्या नखीच्या जखमेची खात्री करून लस देण्यासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
पिंपरखेड आणि परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊसतोडीचा हंगाम संपत आल्याने अन्नाच्या शोधात बिबट्या आता थेट अंगणात, ओट्यावर, कधी दारात येत असल्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. शेतकरी नागरिक यांनी वारंवार तक्रारी करुनही संवेदनाहीन वन अधिकारी व निष्ठूर शासनाला कोणतीच दया येत नसल्याने नागरिकांकडून बिबट्याबाबतच्या तक्रारी कमी येत असल्या तरी बिबट्याचा उपद्रव कमी झाल्याचा गैरसमज वनविभागाने करू नये.
एकूणच बिबट्याचा मानवी वस्तीवरील वाढता वावर आणखी धोकादायक ठरत असून वनविभागाचे अधिकारी यांच्या कडून याकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.