कलेढोण येथील पवार कुटुंबात जन्मलेले पंढरीनाथआबा आदर्श जीवन जगले. त्यांचे वडील मुंबईत पोर्ट ट्रस्टमध्ये असले तरी घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांनंतर पंढरीआबांनी जिद्द व कष्टाच्या जोरावर कुटुंब नावारूपास आणले. सुरवातीच्या काळात आबा शेती करत असताना पत्नी सोनाबाई यांच्या साथीने सुखी संसाराची वेल बहरली. दोन मुले आणि चार मुलींसह कुटुंबकबिला सांभाळत आबा स्वत:चे आयुष्य यशस्वीपणे जगले.
आबांनी गावात आपली चांगली प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या बोलक्या, मनमिळाऊ व जिद्दी स्वभावामुळे त्यांना आपोआप समाजात मनाचे स्थान मिळाले. गावाच्या पश्चिमेला विस्तारलेला पवार मळा, तसा शे-दोनशे उंबऱ्याचा गावाचा छोटा भागच म्हणावा लागेल. समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आबांनी पार पाडली. समाजातील वादविवाद चव्हाट्यावर न येता आपापसात मिटू लागले. खंडोबा यात्रा, गावाची यात्रा, लग्नसमारंभ, अडचणीचे प्रसंग, गावातील राजकारण किंवा सुखदुःखाच्या कार्यांमध्येही आपला समाज एकसंध रहावा, अशी त्यांची इच्छा असायची. त्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला. आपल्या कुटुंबाकडेदेखील त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी ते अविरत झटत राहिले.
त्यांचे थोरले चिरंजीव ईश्वरशेठ यांनी अल्पवयात गलाई व्यवसायात लक्ष घातले आणि अल्पावधीतच परराज्यात जाऊन जम बसवला. आबांच्या जबाबदाऱ्या हळूहळू कमी होत गेल्या, तसे ते लोकांसाठी वेळ देत राहिले. निःस्वार्थी, चारित्र्यसंपन्न आयुष्य जगताना जुन्या पिढीचा वारसा जपत आबांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. राजकारणात सक्रिय झालेले कलेढोणचे सुपुत्र ऍड. शरदचंद्र भोसले (बापूंच्या) समवेत स्वतंत्र पार्टीच्या स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. गावात जयभावानी महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व सोसायटी या संस्था उभारण्यात आबांनी योगदान दिले. ते अगदी शेवटपर्यंत शदरचंद्र भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. दिवंगत हणमंतराव साळुंखे (तात्या) यांच्याशीदेखील त्यांचे राजकारणापलीकडचे मित्रत्वाचे संबंध होते.
दैनंदिन जीवनात आबा विवेकी दृष्टिकोनाचे, सडेतोड धारणेच,े चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व म्हणून वावरले.राजकारणात त्यांनी पदाची, सन्मानाची अपेक्षा केली नाही. राजकीय वातावरणाचा परिणाम त्यांनी व्यक्तिगत जीवनावर किंवा कुटुंबावर होऊ दिली नाही. दुजाभाव न करता त्यांनी सर्वांशी आपुलकीने व्यवहार केले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. त्यांच्या संस्कारांमुळे त्यांचा मुलगा ईश्वरशेठ पवार कोईमतूर येथे गलाई व्यवसायात कार्यरत आहेत. धाकटे चिरंजीव चंद्रकांत पवार हे पंचायत समितीचे माजी सभापती व कलेढोणचे सरपंच होते. आबांनी व्यक्तिगत जबाबदाऱ्या पार पाडताना समाजातील आपले स्थान, प्रतिष्ठा नेहमीच जपली. आबा खऱ्या अर्थाने पवार समाजाला आपले कुटुंब मानत. त्यांच्या निधनामुळे समाजातील बापमाणूस हरपल्याची भावना असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– दीपक नामदे, कलेढोण