नागरिक त्रस्त ः वारंवार अपघातांमुळे कायमच महामार्ग चर्चेत
सासवड – पुणे – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग दुरवस्था, अपघात यामुळे कायमच चर्चेत आणि विवादात राहिलेला महामार्ग म्हणून ओळखला जातो. आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर वर्षभर लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. याच महामार्गावरून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतो. म्हणूनच या महामार्गाला राष्ट्रीय पालखी महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे.
याच महामार्गाचा काही भाग सासवड नगरपालिका हद्दीतूनही जातो, तब्बल सात ते आठ वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. मोठा गाजावाजा करत तत्कालीन सरकारने या महामार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरणाचे काम हाती घेतले होते, मात्र भूमिअधिग्रहण रखडलेल्या स्थितीत आहे.
या महामार्गाबाबत प्रशासकीय दिरंगाईचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांना सोसावा लागत आहे. पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचा सासवड शहरातून जाणाऱ्या भागांमध्ये हिवरकर मळा ते सासवड शहरातील पीएमटी स्टॉप पर्यंत दुभाजक बसविण्यात आले आहेत. हे दुभाजक तांत्रिक बाबींची पूर्तता न करता बसवलेले असल्याचे दिसून येत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहीे. या दुभाजकाला धडकून अनेक निरपराध नागरिकांचे जीव गेले आहे.
उशिरा का होईना पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी दुभाजकांना रिफ्लेक्टर बसवले होते. तेही अवघ्या एक महिनाही उलटून गेला नाही तोच आता सासवड नगरपालिकेने काढले आहेत. त्या ठिकाणी पथदिवे बसवण्यासाठीचे खांब रोवले आहेत. या दुभाजकांना अनेक ठिकाणी वाहने येण्या-जाण्याचा रस्ते ठेवलेले आहेत.
कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता ये – जा करण्यासाठी येथील दुभाजक तोडण्यात आले आहेत. यामुळे नवीन वाहन चालकांना रात्रीच्या वेळी दुभाजकाचा अंदाज येत नाही. या ठिकाणी जर एखादा दुचाकीस्वार धडकला तर त्याला आपला जीव गमवावा लागणार आहे. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी श्रुती नाईक व गणेश चौरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
नगरपालिका-प्राधिकरण समन्वयाचा अभाव
रिफ्लेक्टरकरिता होणारा पैसा हा सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून भरलेल्या करातून खर्च केला जात आहे. याठिकाणी शासकीय निधीचा अपव्यय होताना दिसत आहे. सासवड नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता पालखी महामार्गावरती रिफ्लेक्टर बसवले होते. आम्ही आता याठिकाणी ते रिफ्लेक्टर काढून त्या ठिकाणी पथदिवे व ट्राफिक सिग्नल बसविण्याकरता खांब रोवले आहेत.
– मार्तंड भोंडे, नगराध्यक्ष सासवड.