ठाणे – पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ( Palghar mob lynching case ) अटक करण्यात आलेल्या ५३ जणांना आज विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी २०१ जणांना अटक केली असून आतापर्यंत यातील ५७ जणांची जामिनावर सुटका झाली आहे.
याबाबत सुनावणी करताना जिल्हा न्यायाधीश पी पी जाधव यांनी आज ५३ जणांना प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या महिन्याच्या सुरुवातीस न्यायालयाने याप्रकरणात चौघांना जामीन मंजूर केला होता. आज ५३ जणांना जामीन मंजूर केल्याने आता एकूण जामीन मंजूर झालेल्यांची संख्या ५७ इतकी झाली आहे.
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात हे हत्याकांड घडले होते. अंत्यसंस्कारासाठी गुजरातला निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकास चोर असल्याचे समजत जमावाने त्यांचा बळी घेतला होता. या हत्याकांडामध्ये चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा वाहन चालक निलेश तेलगडे (३५) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.