ठाणे – पालघर येथे जमावाने केलेल्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या गाडीच्या चालकाची हत्या झाली होती. या प्रकरणात जे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यातील चार आरोपींना विशेष न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यात एक आरोपी आणि त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे.
जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी या आरोपींना प्रत्येकी पंधरा हजाराच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. लक्ष्मण रामजी जाधव, नितीन लक्ष्मण जाधव, मनोज लक्ष्मण जाधव आणि तुकाराम रूपाजी साठे अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
ते सर्व जण गडचिंचले भागातील हेडपाडाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एकूण दोनशे जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य काही आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या 26 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.