नवी दिल्ली -भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्याची तयारी दर्शवली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ कौन्सिलची शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती वरिष्ठ कौन्सिलच्या सदस्यांना दिल्याचे समजते. यंदा टी-20 वर्ल्डकप भारतात होणार असून या स्पर्धेला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावांमुळे या दोन संघांमध्ये 2013 नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यातच पाकिस्तान संघाला वर्ल्डकपसाठी भारतात येऊ देण्यावरही प्रश्नचिन्ह होते; परंतु आता केंद्र सरकारने पाकिस्तान संघाला व्हिसा देण्याची तयारी दर्शवली आहे.
तसेच बीसीसीआयने वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी नऊ ठिकाणेही निश्चित केली असून अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केले जाईल. अहमदाबाद व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि धरमशाला येथे या स्पर्धेचे सामने घेण्याची बीसीसीआयची योजना आहे.
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडू आणि सदस्यांना भारताकडून व्हिसा देण्याची बीसीसीआयने हमी द्यावी. अन्यथा स्पर्धा अन्यत्र खेळण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आयसीसीकडे करण्यात आली होती.
सर्व अडचणी दूर करू
पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या व्हिसाबाबत ज्या अडचणी होत्या, त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. मात्र, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात प्रवेश मिळणार का, हे इतक्यात सांगता येणार नाही. याबाबत काही काळात निर्णय घेतला जाईल. मात्र, आम्ही सर्व अडचणी दूर करू, असे आयसीसीला सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती बीसीसीआय सचिवांनी वरिष्ठ कौन्सिलच्या बैठकीत दिली असल्याचे वरिष्ठ कौन्सिलच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.