जिनिव्हा – पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाचा वापर अन्य देशांविरोधातील परराष्ट्र धोरणाप्रमाणे केला जातो आहे, अशी टीका राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी रविवारी केली. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आंतर संसदीय गटाच्या बैठकीमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधित पार्श्वभुमीचा पाढाच वाचला.
ज्या देशाच्या संसदीय लोकशाहीचा इतिहास अत्यंत वाईट आहे, अशा देशाने इतरांना लोकशाहीबद्दल व्याख्यान देणे हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी उघडलेली दहशतवादाची फॅक्टरी आगोदर बंद करावी, असा सल्लाही हरिवंश यांनी यावेळी दिला.
आंतर संसदीय संघटनेच्या १४८ व्या सत्राच्या बैठकीदरम्यान पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना हरिवंश बोलत होते. जम्मू काश्मीरसह लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे, आणि यापुढेही असेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.
भारतातील लोकशाहीचे अनुकरण करण्यासाठी भारताचे मॉडेल अनेकांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. मात्र ज्या देशाचा संसदीय लोकशाहीचा इतिबास अत्यंत मवाईट आहे, अशा देशाने इतरांना लोकशाहीबद्दल शिकवणे हास्यास्पद आहे. असे खोटे , बिनबुडाचे आणि हास्यास्पद आरोप करून पाकिस्तानने आंतर संसदीय संघटनेच्या मंचाचे अवमूल्यन करू नये, असेही हरिवंश म्हणाले.
पाकिस्तानने सातत्याने दहशतवादाचा वापर अन्य देशांविरोधात केला असल्याकडे हरिवंश यांनी लक्ष वेधले. जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानमध्येच सापडला होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेले सर्वाधिक दहशतवादी पाकिस्तानमध्येच आहेत, याकडेही त्यांनी आंतर संसदीय संघटनेच्या सदस्यांचे लक्ष वेधले.
पाकिस्तानने किमान आपल्या स्वतःच्या भल्यासाठी तरी चांगला धडा घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. हरिवंश यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ या आंतर संसदीय संघटनेच्या बैठकीमध्ये सहभागी झाले आहे.