लाहोर – कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानी हे भारताची मोठी संपत्ती असून दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद प्रस्थापित झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी लाहोर येथील एका कार्यक्रमात मांडली आहे.
रविवारी येथील एका कार्यक्रमात अय्यर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांच्या या भाषणाला द डॉन या पाकिस्तानी माध्यमाने प्रसिध्दी दिली आहे. डॉनच्या हवाल्याने एएनआयने आता अय्यर यांच्या भाषणातील काही मुद्दे समोर आणले आहेत.
यावेळी अय्यर म्हणाले की मी स्वानुभवावरून सांगतो की पाकिस्तानी लोक प्रत्येक बाबतीत चांगला प्रतिसाद देतात. काहीवेळा तर समोरच्या बाजूच्या पेक्षा जास्त प्रतिसाद देतात.
आपण त्यांच्याशी मैत्री दाखवली तर ते अधिक मैत्री दर्शवतात आणि आपण शत्रुत्व दर्शवले तर ते अधिक शत्रुत्व जोपासतात. पाकिस्तानात माझे जेवढ्या प्रेमाने आणि खुल्या मनाने स्वागत होते तेवढे अन्य कोणत्याही देशात होत नाही.
डॉनने दिलेल्या बातमीनुसार अय्यर जेंव्हा पाकिस्तानात कौन्स्यूल जनरल होते तेंव्हा त्यांची आणि त्यांच्या पत्नीची किती आत्मियतेने तेथे काळजी घेतली गेली याचेही स्मरण अय्यर यांनी केले. मेमॉयर्स ऑफ ए मॅवेरिक या आपल्या पुस्तकाबद्दलही ते यावेळी बोलले.
भारतीय पाकिस्तानबद्दल जशी कल्पना करतात त्यापेक्षा पाकिस्तान कितीतरी वेगळा असल्याच्या अनेक घटना आपण या पुस्तकात मांडल्या असल्याचे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिकांनी संवादाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे.
उद्योगपती, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांनी सरकारांना बायपास दोन्ही देशांच्या बाहेर भेटत राहीले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तानच्या संबंधान सदभावनेची आवश्यकता आहे.
मात्र २०१४ मध्ये भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर गेल्या १० वर्षांत सगळे विपरित घडले आहे. भारतातील विद्यमान हिंदुत्ववादी सरकार पकिस्तानशी चर्चा करण्यास इच्छूक असेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल.
मी पाकिस्तानच्या नागरिकांना सांगू इच्छीतो की मोदींना कधीच एक तृतियांशपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. मात्र आमची सिस्टिमच अशी आहे की तुमच्याकडे एक तृतियांश मते असतील तर तुमच्याकडे दोन तृतियांश जागा असतात. त्यामुळेच दोन तृतियांश भारतीय लोक तुमच्याकडे (पाकिस्तान) येण्यास तयार आहेत.