लहोर: काश्मीर मुद्या आंतरराष्ट्रीयस्तरावर नेल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून आता स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी)च्या 100 कमांडोंना एलओसीजवळ पाठवण्यात आले आहे. यावरून पाकिस्तान काहीतरी भारतविरोधी कृती करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
पाकिस्तानकडून गुजरातच्या सीमेलगत असलेल्या इक्बाल-बाजवा या पोस्टवर एसएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य वाढीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर भारतीय चौक्या देखील सतर्क झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जवानांनी अशातच केरन आणि माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या “बॉर्डर ऍक्शन टीम’ कडून करण्यात आलेल्या कारवाईचा प्रयत्न उधळून लावला होता.