जम्मू,- पाकिस्तानमधून तस्करीमार्गे भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवण्याचे प्रयत्न सातत्याने होतात. त्यावरून भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पाकिस्तान रेंजर्सला खडसावले.सीमेवर तैनात असणाऱ्या दोन्ही देशांच्या दलांमध्ये कमांडर स्तरावरील नववर्षातील पहिली बैठक झाली.
त्यामध्ये तस्करीचे प्रयत्न बिल्कूल खपवून घेतले जाणार नाहीत, असे बीएसएफने ठणकावले. बैठकीत सीमेशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बीएसएफने प्रामुख्याने तस्करीच्या मुद्द्यावर भर दिला. सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न अनेकदा होतात. तशा प्रकारांना आळा घालण्याची सूचनाही बीएसएफने केली.
मागील काही काळापासून भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. त्याकडे बीएसएफने लक्ष वेधले. तसेच, ड्रोनच्या घिरट्यांमुळे सीमाविषयक नियमांचा भंग होत असल्याचे नमूद केले. एकप्रकारे बीएसएफने पाकिस्तानी कुरापतींवर नेमकेपणाने बोट ठेवले. मात्र, भारतीय सुरक्षा दलांकडून अनेकदा धडा शिकवला जात असूनही त्यातून पाकिस्तान बोध घेत नसल्याचेच दिसते.