कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असून हा संघ अनेक बदलांसह मैदानात उतरला आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना भारतासोबत होता आणि त्या सामन्यात खेळणाऱ्या संघातील निम्मे खेळाडू या सामन्यात खेळत नाहीत. श्रीलंकेच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचा टॉस दुपारी 2.30 ला होणार होता आणि सामना 3.00 वाजता सुरू होणार होता.मात्र पावसामुळे टॉस आणि सामना सुरू झाला नव्हता. त्यानंतर 4.30 वाजता कोलंबोमध्ये पाऊस थांबल्यानंतर पंचांनी सायंकाळी 5 वाजता Toss घेण्याचा आणि 5.15 वाजता सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला.पावसामुळं वेळ वाया गेल्याने 45 षटकांंचा सामना खेळवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.
दोन्ही संघातील Playing 11 :-
पाकिस्तान : फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
दरम्यान, सुपर फोर गटात भारतीय संघाने पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांना पराभूत करत थाटात अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांनी बांगलादेशचा पराभव केल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. आता आज होत असलेल्या पाकिस्तान व श्रीलंका या सामन्याला जणू उपांत्य फेरीचेच स्वरुप आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
श्रीलंका संघाने सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. पाकिस्तान संघानेही पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आणि नंतर या दोन्ही संघांना भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला.