इस्लामाबाद – पाकिस्तानातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले असून आता विरोधी पक्षांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट अर्थात पीडीएम या चळवळीने इम्रान खान सरकारवरचे हल्ले आणखी तिव्र केले आहेत. हे सरकार हटवण्यासाठी कोणतेही बलिदान देण्याची आमची तयारी असून हा आमचा जिहाद असल्याचे पीडीएमचे प्रमुख मौलान फजलूर रेहमान यांनी म्हटले आहे.
सरकारकडून गरीबांवर होणारे अत्याचार जोपर्यंत संपुष्टात येत नाहीत, तोपर्यंत हा जिहाद सुरूच राहणार आहे. इम्रान खान यांचे सरकार हे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सरकार असल्याची टीकाही मलकंद येथे झालेल्या रॅलीत बोलताना रेहमान यांनी केली. यापूर्वीही पीडीएमच्या बहवालपूर, पेशावर, कराची, मुलतान आणि क्वेट्टा व लाहोर येथे महारॅली झाल्या आहेत.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनच पीडीएमने सरकारची कोंडी केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यासाठी त्यांना 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. इम्रान यांचे सरकार झीया उल हक आणि परवेज मुशर्रफ यांच्या राजवटीप्रमाणे कामकाज करते आहे. या लोकांच्या कारकीर्दीत पाकिस्तानात लोकशाही संपुष्टात आली होती.
आजही तीच स्थिती देशात आहे. सरकार घटनेच्या विरोधात काम करत असून त्यांना देशात मार्शल लॉ लावायचा आहे. किंबहुना पाकिस्तानातील आताची राजवट ही मुशर्रफ आणि झीया उल हक यांच्या राजवटीपेक्षाही धोकादायक आहे, असा आरोप रेहमान यांनी केला.
इम्रान सरकार हटवण्यासाठी आणि देशात पुन्हा लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. येत्या 19 तारखेला पाकिस्तान निवडणूक आयोगासमोर निदर्शने केली जाणार असून त्यानंतर 21 तारखेला सरकारच्या विरोधात मोठी रॅली काढली जाणार आहे. हे सरकार उखडून फेकण्यासाठी मोठ्या संख्यने यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी जमावाला केले.