शेतकरी चिंतातूर : करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकांच्या अडचणीत वाढ
पवनानगर – पवनमावळातील काही भागात भातपिकावर करपा, कडा-करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला. जोमात असलेल्या पिकावर अचानक कोसळलेल्या करपासंकटामुळे भातशेतीवर अडचणीत सापडली आहे. करपा रोगामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाययोजना केल्या जात आहेत.
मावळ तालुका हा पुणे जिल्हातील पश्चिमेचे टोक. हा तालुका कोकणपट्टीचा तालुका आहे, त्यामुळे मावळ तालुका हा भातशेती आगार म्हणून तालुक्याला ओळखले जाते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. तालुक्यात 12 हजार 670 हेक्टरवर भातशेती आहे. यामध्ये इंद्रायणी या वाणाची 80 टक्के लागवड आहे.अन्य वाणांची 10 टक्के लागवड केली आहे. तर यामध्ये तालुक्यात चारसूत्री पद्धतीने 1205 एकरवर लागवड झाली.
यांत्रिकरणावर 100 एकरावर (40 हेक्टरवर) पेरा झाला. तर एसआरटी पद्धतीने 169 हेक्टर आणि उर्वरित क्षेत्रावर पारंपारीक पद्धतीने लागवड केली आहे, तर मावळ तालुक्यामध्ये करपा व करडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून, शेतकऱ्यांची झोप उडाली.
सध्या करोनाने शेतकरी त्रस्त झाला आहे. आता भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होईल की काय या विचाराने शेतकरी चिंतातूर झाले आहे. करपा या रोगाचा प्रादुर्भाव पवनमावळमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे, तर बाकीच्या ठिकाणी अजून करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.
पवन मावळातील सडवली, उर्से, सडवली, बौर, आढे, ओझुर्डे, थुगाव आदी गावात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंडल कृषी अधिकारी, काळे कॉलनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिकाची पाहणी केली.
दरम्यान, सडवली गावामध्ये भातशेतीवर करपा, कडा-करपा रोगाचा प्रसार झाल्यामुळे मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय शेटे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, कृषी सहायक अश्विनी खंडागळे यांनी पाहणी केली. या वेळी मारुती ओझरकर, कैलास ओझरकर, राजाराम ओझरकर हे शेतकरी उपस्थित होते.
करपा, कडा-करपा नियंत्रणासाठी
या आहेत उपाययोजना
1) 25 ग्रॅम कॉपरऑक्सिक्लोराइड किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 6 ग्रॅम ट्रायसायक्लोझोल किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक. 2) स्ट्रेप्टोसायक्लीन 1.5 ग्रॅम आणि 3) स्टिकर 20 मिली वरील तिन्ही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.
कृषी सहाय्यकांमार्फत गावात जाऊन कृषीवार्ता फलक लावण्यात येत आहेत, त्यावर औषध फवारणी कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय तालुक्यामध्ये कृषीमित्रांच्या साहाय्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काय उपाययोजना कराव्यात याचीही माहिती त्यांना पाठवली जात आहे. ज्याठिकाणी कृषी शाळा आहेत, त्याठिकाणी जाऊन त्याची माहिती देण्यात येत आहे, तर प्रत्यक्ष शेतीवर जाऊन कोणती औषध फवारणी करावी, याची माहिती देण्यात येत आहे.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.