विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
“नीरा देवघर’मधूनही “नीरे’त विसर्ग
पाच मोऱ्यातून 10 हजार 821 क्युसेकने सोडले पाणी
धरण क्षेत्रातील विश्रामगृह गळके
नीरा देवघर धरणस्थळी धरणाची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दोन मजली विश्रामगृह बांधले आहे. मात्र, अतिवृष्टी सुरू असल्याने विश्रामगृह गळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.नीरादेवघर जलाशयाचे पूजन
भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी धरणस्थळास भेट देऊन धरणातील जलाशयाचे साडीचोळी, हार, नारळ अर्पण करुन पूजन केले. यावेळी शाखा अभियंता परमानंद गोसावी, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे, वाठार ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप खाटपे, पत्रकार सूर्यकांत किंद्रे, चंद्रकांत जाधव, विजय जाधव, धरण प्रकल्पाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भोर – तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा देवघर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे धरणाच्या पावर हाऊसमधून 7 हजार 500 तर पाच मोऱ्यातून 10 हजार 821 क्युसेकने नीरा नदीत विसर्ग केला जात आहे, अशी माहिती धरण प्रकल्पाचे शाखा आभियंता परमानंद गोसावी यांनी दिली.
नीरा देवघर धरण शनिवारी (दि. 3) दुपारी तीन वाजता 98.29 टक्के भरले होते. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच धरणातून 20 हजार क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता 11.91 टी.एम.सी. आहे. धरण मातीचे असल्याने प्रशासनाने धरण 100 टक्के भरण्याअगोदर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळपर्यत धरण 100 टक्के भरेल, असा विश्वास गोसावी यांनी व्यक्त केला. याचबरोबर वीर धरणात 93.56 टक्के पाणीसाठा झाला असून भाटघर आणि नीरादेवघरचे पाणी या धरणात संकलित करुन ते बारामती आणि पंढरपुरला कालव्यातून सोडले जाते. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण प्रकल्पात 99.37 टक्के पाणीसाठा झाला आहे.
भाटघर धरण परिसरातही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे शनिवारी सकाळी धरण 95.70 टक्के भरले होते. असाच पाऊस सुरू राहिल्यास दोन दिवसांत धरण 100 टक्के भरेल. भाटघर धरण 24 टी.एम.सी.चे असून धरणाच्या पाण्यावर पूर्वेकडील शेतकऱ्यांची शेती आवलंबून आहे.
– अनिल नलावडे, शाखा आभियंता