मुंबई : राज्यात सुमारे दीड महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून करोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात आज 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले. काल दि. 24 एप्रिलपर्यंत राज्यात 1 लाख 2 हजार 189 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह, तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आजमितीस शासकीय आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. राज्यात साधारणत: दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने करोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे. साधारणत: 21 जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर करोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली.
त्यानंतर बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत होते. राज्यात सुरूवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. राज्यात साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे तीन महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे.