नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री काही अज्ञात लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.
कन्याकुमारी जिल्ह्यात रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. दरम्यान, कन्याकुमारी जिल्ह्यातील कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत आंदोलक आक्रमक झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसपी हरी किरण प्रसाद म्हणाले, पुतळ्याची तोडफोड झाली की नाही हे आम्हाला माहीत नाही. मूर्तीचं थोड नुकसान झाले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि नेमकी काय घटना घडली याचा शोधण्यासाठी एक टीम तयार केली आहे.”