सातारा -सनसनाटी चर्चा करण्यापलीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना काहीच काम नाही. कॉंग्रेसचा विचार तळागाळात रुजला आहे. पक्ष अद्याप शाबूत आहे. आमची ध्येयधोरणे व कार्यपद्धतीवर भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टोलेबाजी गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी केली.
कॉंग्रेसचा विचार आजही गावागावात आहे. नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून, ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात कॉंग्रेस बॅकफूटवर आहे. पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी काय करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, पक्ष संघटन वाढविण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. यादी घेऊन बसलो, तर मागच्या पाच वर्षांत आमचे किती लोक दुसऱ्या पक्षात गेलेत, हे समजेल. तीच कॉंग्रेसची ताकद होती.
दुर्दैवाने पक्षाने ज्यांना मोठे केले, तेच पक्षातून बाहेर गेले. राजकारणात असे घडत असते. नवीन कार्यकर्ते तयार करून पक्षाला उभारी देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. कॉंग्रेस पक्ष अजून संपलेला नाही.
पक्षाचे विचार मानणारा वर्ग गावागावांत आहे. नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून ताकद देण्याची आमची जबाबदारी आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल का, या प्रश्नावर, पाच नव्हे 25 वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याला दोन गृह राज्यमंत्री असल्याचे जनतेला माहितीच नाहीत, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना ना. पाटील म्हणाले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्या भाजपमध्ये का गेल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आमचे काम राज्यातील लोक पाहत असल्याने भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही.