नवी दिल्ली – पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व 7 जागा लढवण्याची तयारी असल्याचे आपने बुधवारी सूचित केले. त्यामुळे दिल्लीत स्वबळावर लढण्याचा विचार तो पक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून आप विरोधक ऐक्याचा भाग बनणार की नाही, असा प्रश्न पुन्हा पुढे आला.
भाजपविरोधात देश पातळीवर एकवटण्याच्या उद्देशातून पाटण्यात नुकतीच विरोधी पक्षांची बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत सहभागी होऊनही आप आणि कॉंग्रेस या पक्षांमधील दुरावा कायम असल्याचे चव्हाट्यावर आले. मोदी सरकारने आणलेल्या दिल्ली अध्यादेशाला विरोध दर्शवून कॉंग्रेसने आम्हाला बैठकीत पाठिंबा द्यावा, अशी आग्रही भूमिका आपने घेतली. मात्र, कॉंग्रेसने आपची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आपने कॉंग्रेसशी हातमिळवणी करणे अवघड असल्याचे बैठकीनंतर म्हटले.
त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी पुन्हा आपची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपचे नेते संदीप पाठक यांनी संभ्रम वाढवणारी भूमिका मांडली. विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण, ती घडामोड कॉंग्रेसवर अवलंबून आहे. कॉंग्रेसची खुल्या मनाने सर्वांना समवेत घेण्याची इच्छा असेल तर विरोधक एकत्र येतील. पण, कॉंग्रेस अहंकारी राहिल्यास अवघड होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा आप लढवेल, अशी पुस्तीही जोडली.