मुंबई – शिवसेनेच्या (शिंदे गट) एका जाहिरातीमुळे सध्या राजकारणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या जाहिरातीचे शीर्षक ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असे होते. तर यात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून विरोधकांसह भाजपने देखील शिंदे गटावर निशाणा साधला. यालाच आता खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याणमधील एका कार्यक्रमातून प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, “खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे.” यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना चांगलेच खडेबोल देखील सुनावले. “ही युती नैसर्गिक असून आपल्या भावना आवरा आणि युतीत धर्म पाळा. एकत्र येऊन काम केले तर काम चांगले होईल.”
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अगोदरच सरकार घरी होतं. आता हे सरकार आपल्या दारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे. तसेच राम मंदिर बांधणाऱ्यांसोबत गेलो तर बिघडलं कुठे?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. “कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात एकनाथ शिंदे लोकांमध्ये होते. शिंदे यांनी ठाण्यात शिवसेना पुढे नेण्याच काम केलं. ठाकरेंच्या वागणुकीला कंटाळून आमदार – खासदार त्यांना सोडून गेले.” अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी केली.
विरोधकांनी भाजप-शिंदे गटातील वादावर केलेल्या टीकेवर श्रीकांत शिंदे म्हणाले, “विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. भाजप-शिवसेनेते कसं वितुष्ट निर्माण होईल, लावालाव्या कशा करायच्या हे सुरू आहे. विरोधकांना बघवत नाही. आमच्यात सर्व गोष्टी चांगल्या सुरू आहेत. आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं, विकास करण्याचं काम करत राहू.”