पुणे – गृहनिर्माण संस्थांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) मोहिमेला सोसायटींकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मागील महिन्यात शहरातील सुमारे 212 सोसायटींनी मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
पुणे शहरात सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या 20 हजार 655 इतकी आहे. यातील सुमारे 10 हजार संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केले आहे. आता ही प्रक्रिया राज्य सरकारने अधिक सुलभ केली आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण झालेले नाही. अशा संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करून देण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशावरून सहकार आयुक्तांनी पुढाकार घेत दि. 1 एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अभिहस्तांतरण झालेल्या, न झालेल्या संस्थांची यादी बनवणे, अभिहस्तांतरण न झालेल्या संस्थांसाठी आदी उपक्रम या मोहिमेतंर्गंत घेण्यात आले आहेत.
आणखी अर्ज येण्याची अपेक्षा
यापूर्वी वर्षभरात मानीव अभिहस्तातंरण करण्यासाठी सुमारे तीनशे ते साडेतीनशे अर्ज दाखल होत होते. मोहीम हाती
घेतल्यानंतर अर्ज दाखल करणाऱ्या सोसायटींची संख्या वाढली आहे. वर्षभरामध्ये किमान सहाशे ते आठशे अर्ज दाखल होण्याची शक्यता सहकार विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
…म्हणून मानीव अभिहस्तांतरण आवश्यक
सोसायटीचे मानीव अभिहस्तांतरण न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक ( एफएसआय) वाढवून घ्यायचा असेल तर अडचणी येतात. त्यामुळे संबंधित जागेची मालकी हक्क असलेला पुरावा म्हणजे सात-बारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डवर यावर गृहनिर्माण संस्थेचे नाव असणे आवश्यक आहे. अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात.