मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या अटीची पुर्तता केली नाही तर त्यांचे वेतन कापले जाईल असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सर्व सरकारी कार्यालयांसाठी हा आदेश जारी केला आहे.
ज्यांची सुट्टी मंजूर झाली आहे किंवा जे आजारपणाच्या रजेवर आहेत ते कर्मचारी सोडून सर्व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांना ज्या दिवशी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे त्या दिवशी ते हजर न राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे वेतन कपात केले जाणार आहे.
राज्यात सध्या करोनाचे लॉकडाऊन सुरू आहे. हे लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असणार आहे. त्या कालावधीत कमी कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालयात उपस्थित राहण्याची सवलत देण्यात आली असली तरी सर्व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी संबंधित कार्यालयात उपस्थित राहणे या आदेशान्वये बंधनकारक असणार आहे.