नवी दिल्ली : पाटण्यात आज राजकीय दृष्टीने मोठी घटना घडत आहे. 2024 च्या निवडणूकी मध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी संबंध देशातील विरोधक एकवटले आहेत. मोदींचा पराभव करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावून विरोधकांनी वज्रमूठ तयार केली आहे. तरीसुद्धा विरोधकांची एकता फार दिवस टिकू शकणार नाही, एवढं नक्की.
कारण कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष सोडल्यास इतर पक्षाचा देशभरात फारसा प्रभाव दिसून येत नाही. यामुळे मोदींचा पराभव 2024 मध्ये करणे विरोधकासाठी सोपे नसेल एवढं नक्की.
विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे तसेच अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. अजेंडा एकच आहे – 2024 च्या निवडणुकीत भाजपला एकजूट होऊन पराभूत करणे.
450 जागांवर विरोधक “वन इज टू वन’ फॉर्म्युला घेऊन भाजपला आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच भाजप उमेदवाराच्या विरोधात विरोधकांकडून एकच उमेदवार उभा केला जाणार आहे. मात्र, या फॉर्म्युल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे ते जागावाटपाचे, म्हणजे कोणत्या पक्षाचा उमेदवार किती जागा लढवणार यावर.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह देशभरात लोकसभेच्या सुमारे 200 जागांवर कॉंग्रेस मजबूत असल्याचा ममता यांचा विश्वास आहे. लोकसभेच्या या 200 जागांपैकी 91 फक्त राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये आहेत. विरोधी ऐक्यासाठी ममतांचा फॉर्म्युला लागू केल्यास कॉंग्रेसला 227 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.
या अशा जागा आहेत ज्यांवर 2019 मध्ये कॉंग्रेस एकतर जिंकली किंवा भाजपच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आली. याशिवाय 34 जागा अशा आहेत जिथे कॉंग्रेस प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातील काही जागा कॉंग्रेसला देण्यास ममता तयार असू शकतात, असे मानले जात आहे.
यामुळे अनेक राज्यातून कॉंग्रेसला माघार घ्यावी लागणार आहे. यात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कॉंग्रेसने सांगितले की,
लोकसभा निवडणुकीत युती झाल्यास 350 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवणार नाही. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. कॉंग्रेसने 2019 मध्ये 421 जागा लढवल्या होत्या. अशा स्थितीत ते विरोधी पक्षांसाठी 193 जागा सोडण्याच्या तयारीत आहेत.
राहुल यांनी अमेरिका दौऱ्यातही विरोधी ऐक्यासाठी काही द्या आणि काही घ्या, असे म्हटले होते. कॉंग्रेसने नितीश कुमार यांनाही याबाबत माहिती दिली आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेस जागांबाबत अंतिम निर्णय घेईल, असे मानले जात आहे. येथे कॉंग्रेसच्या विजय-पराजयाचा परिणाम जागांवरही होणार आहे.