नवी दिल्ली –एप्रिल ते जून या काळात भविष्यनिर्वाह निधीतील बरीच रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर कमी करण्याची गरज असल्याचे वृत्त काहीजण पेरत आहेत. यामध्ये कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी हस्तक्षेप करावा आणि हा प्रयत्न हाणून पाडावा, असे कामगारांची संघटना असलेल्या आयटकने म्हटले आहे.
एप्रिल-जून महिन्यात निधीतून 22 हजार कोटी रुपये काढून घेतले गेले. गेल्या वर्षी या काळात 20 हजार कोटी रुपये काढून घेतले गेले होते. मात्र यावर्षी काढून घेतलेल्या रकमेचा आकडा फुगवून 30 हजार कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कमी होत असल्यामुळे व्याजदर कपातीची गरज आहे असे वृत्त पसरविण्यात येत आहे. काही वृत्त माध्यमांमध्ये सरकारी सूत्रांचा हवाला देऊन मोठी रक्कम काढली जात असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, यासाठीची तुलनात्मक आकडेवारी टाळली जाते. भविष्यनिर्वाह निधीतून रक्कम काढण्यास केंद्र सरकारने करोना व्हायरसमुळे परवानगी दिलेली आहे. याचा काही प्रमाणात कामगाराकडून उपयोग होत आहे. त्यामध्ये वावगे असे काही नाही, असे आयटकने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. कामगार आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्याना पैशाची गरज असणे साहजीक आहे. या विषयावर वृत्त माध्यमांनी कामगार मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.