केंदूर -शिरूर तालुक्यातील करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव, शिक्रापूर, मुखई, वढू बुद्रूक या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतात. मात्र सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे उसाचे फड आणि टोमॅटो बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
करंदी आणि परिसरात टोमॅटो पिकासाठी पूरक जमीन आणि वातावरण असल्याने या भागात उसाबरोबरच टोमॅटोची देखील शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी करोना महामारीमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात परवड पाहायला मिळत आहे. त्यातच उसाचे फड देखील भुईसपाट झाले आहेत.
टोमॅटो आणि इतर पिकांनादेखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाने या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रवीण झेंडे, संभाजी ढोकले, प्रकाश दरेकर, वैभव ढोकले, गोरक्ष दरेकर यांनी केली आहे.
मोठ्या धाडसाने तब्बल दोन एकर शेतजमिनीत दोन लाख रुपये खर्च करून साडेबारा हजार टोमॅटोची रोपे लावून बाग उभी केली. अवघ्या दोन दिवसांवर तोडणीसाठी आलेले टोमॅटोचे पीक या पावसामुळे भुईसपाट झाले आहे. आत्ताच्या बाजारभावानुसार 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान पावसाने झाले आहे.
– प्रवीण झेंडे, टोमॅटो उत्पादक करंदी.