नवी दिल्ली – भाजपचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या मुडमध्ये आहेत. विरोधकांचे ऐक्य घडवण्याच्या दिशेने गांभीर्याने वाटचाल सुरू झाल्याचेही आता दिसून येत आहे. ऐक्यासाठी मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवण्याविषयी विरोधी गोटात व्यापक सहमती झाल्याचे समजते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच दिल्लीत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्या महत्वपूर्ण घडामोडीमुळे केवळ चर्चेचा विषय बनलेल्या विरोधक ऐक्यासाठी खऱ्याअर्थाने पहिले पाऊल पडल्याचे मानले गेले. त्या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खर्गे आणि राहुल यांची बैठक झाली. त्यामुळे विरोधक ऐक्याच्या प्रयत्नांना आणखीच बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे.
संबंधित नेत्यांच्या बैठकांमधून ऐक्यासाठी आवश्यक असणाऱ्या रूपरेषेला प्राथमिक आकार मिळाल्याचे सूचित होत आहे. त्यानुसार, मतभेदाचे मुद्दे गुंडाळून ठेवण्याला विरोधी पक्ष प्राधान्य देणार आहेत. राहुल यांनी मागील काळात सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी टीकाटिप्पणी केली.
ती शिवसेनेच्या ठाकरे गटाला रूचली नाही. अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत करण्याच्या विरोधकांच्या मागणीविषयी पवार यांनी असहमती दर्शवली. त्या घडामोडींमुळे विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर, काही वादाचे मुद्दे टाळलेलेच बरे अशा मानसिकतेवर विरोधी पक्ष पोहचले आहेत. विरोधकांच्या संभाव्य आघाडीसाठी किमान समान कार्यक्रम बनवण्याचा विचार पुढे आला आहे.
एकत्र येण्यासाठी अनेक विरोधी पक्ष अनुकूल आहेत. मात्र, काही पक्ष अजूनही कुंपणावर बसलेले आहेत. त्यांनी विरोधी गोटात सहभागी होण्याविषयी अद्याप पत्ते खोललेले नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी एक समिती स्थापण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्या समितीमध्ये पवार, दिग्विजय सिंह (कॉंग्रेस), सीताराम येचुरी (माकप) आदी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.