मुंबई – ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा आणि ओबीसी ‘ए’, ‘बी’ अशी विभागाणी करून मराठा आरक्षण द्यावे, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारला आरक्षणासाठी नवीन कॅटेगरी करता येईल. आम्ही ओबीसीमध्ये आहोत, आमचा वाटा सोडून मराठा समाजाला आरक्षण असेल, तर आम्हाला ओबीसी ए आणि मराठा समाजाची भावनिक इच्छा असेल, तर त्यांना ओबीसी बी करा. याचा अर्थ त्यांचा आरक्षणांचा कोटा वाढवून त्यांना वेगळे द्या. यासाठी आमच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा तिडा आहे की, ओबीसींची मते पाहिजेत. पण ओबीसींसाठी काही करायचे नाही, असा टोलाही त्यांनी सरकारला लगाविला.
मराठा आरक्षणावर लवकर तोडगा निघाला पाहिजे.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचे वाढवून द्या. वाढवून मराठा समजाला जेवढे आरक्षण द्याचे ते द्या. ही जबाबदारी शासनाची आहे. केंद्र आणि राज्यात बहुमताचे सरकार आहे. झटक्यामध्ये काम होऊ शकते. फिरवा फिरवी कशाला करता, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
जरांगेंनी तिसऱ्यांदा फेटाळला जीआर
मराठा आरक्षणाच्या संदर्भात काल रात्री 10.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोज जरांगे यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ही बैठक रात्री 2.30 वाजेपर्यंत पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हातात बंद लिफाफा देण्यात आला.तो त्यांनी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांना दिला. आज तिसऱ्यांदा मनोज जरांगे यांनी सरकारकडून आलेला अध्यादेश म्हणजेच जीआर फेटाळून लावला. त्यामुळे आज तिसऱ्यांदा सरकार जरांगे यांना समजविण्यास अपयशी ठरल्याचे म्हटले जात आहे.