अबूधाबी -सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यात तर त्याने 84 धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सामनाही जिंकला आणि इशानने सामनावीर पुरस्कारही पटकावला. या सामन्यानंतर त्याने टी20 विश्वचषकातील आपल्या स्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
युएईत होणाऱ्या येत्या टी20 विश्वचषक 2021 साठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात 2 यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रिषभ पंतसह इशानचाही समावेश आहे.
याच इशानला त्याच्या टी20 विश्वचषकातील स्थानाबाबत कर्णधार विराट कोहलीने सांगितले होते की, त्याला टी20 विश्वचषक संघात सलामीवीराच्या रुपात निवडण्यात आले आहे. तसेच आपल्या या भूमिकेसाठी तयार राहण्याचे संकेतही त्याने दिला होता.
हैदराबादविरुद्ध सामनावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर इशान म्हणाला, टी20 विश्वचषकापूर्वी मी पुन्हा चांगल्या लयीत परतल्याचा मला आनंद आहे. मी संघासाठी धावा करू शकलो, ही माझ्यासाठी सकारात्मक बाब राहिली आहे. आम्हाला जवळपास 250-260 धावा करायच्या होत्या. हा एक सकारात्मक निश्चय होता. मला या सामन्यात सलामीला फलंदाजी करून चांगले वाटले. मला विराटनेही हेच सांगितले होते की, टी-20 विश्वचषाकासाठी सलामीवीर म्हणून तुझी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मला त्यासाठी तयार राहावे लागेल, असेही त्याने मला सांगितले होते.
मला वाटते की, उच्च स्तरावर क्रिकेटपटूला कोणत्याही परिस्थितीसाठी खेळण्याच्या तयार राहण्याची गरज असते. फक्त क्रिकेटपटूने योग्य मनस्थितीत राहणे महत्त्वाचे असते. त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्मसोबत मैदानात उतरण्याची गरज असते. माझा विराटसोबत खूप चांगला संवाद झाला आहे. जसप्रीतने सुद्धा माझी खूप मदत केली आहे. सर्वांनी माझे समर्थन केले आहे, असेही तो म्हणाला.