मुंबई: राज्यातील परप्रांतीय त्यांच्या-त्यांच्या राज्यात परतले असल्याने आता मराठी तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे. या संधी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारला अनेक सूचना केल्या.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परप्रांतीय परत गेले आहेत. त्यामुळे ते परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाऊ नये. कारण संबंधित राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललयं, हे आपल्याला माहिती नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
त्याचवेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करून घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो, अशीही सूचना त्यांनी केली.
परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध असलेल्या ठिकाणापर्यंतची माहिती पोहोचवा. आपल्याकडे अनेकदा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी त्यांना रोजगाराबाबत माहिती नसते. भाजी विकण्यापासून इतर अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहे. त्यामुळे जर रोजगार उपलब्ध असले तर ते या मुला-मुलींना कळवावे. ही संधी घालवू नये, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.