शरद पवार यांचा विश्वास; भाजप शिवसेना राज्य कोणासाठी चालवतात?
इस्लामपूर – राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगार तरुणांना न्याय मिळत नाही. उद्योगधंदे अडचणीत आहेत. अत्याचार वाढले आहेत. अशा परिस्थितीत भाजप- शिवसेना कोणासाठी राज्य चालवतात आणि कशासाठी मत मागतायेत, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्लामपूर येथे मंगळवारी केला.
यंदाची विधानसभा निवडणूक तरुणांनी हातात घेतली आहे, तेच चमत्कार घडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली. खा. पवार म्हणाले, “”सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, भावनेला हात घालून राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मंडळी 370 चे कलम, काश्मिरसारखे भावनिक मुद्दे मांडून सामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल देत आहेत.
काश्मिरमधील अतिरेक्यांचा बंदोबस्त करायला कोणाचा विरोध असू शकत नाही. मात्र, जागतिक पर्यटन असणाऱ्या काश्मिरमध्ये सामान्य माणसांचे व्यवसाय असून तेथे शांतता नव्हे तर स्मशान शांतता पसरली आहे. हे सरकार गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा सोडून विरोधकांवर दबाव आणत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविल्याने आज सुप्रिम कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
राज्यात राजकीय चित्र बदलत आहे. आमच्या पक्षात इनकमिंग सुरू झाले आहे.” तुमच्या तालुक्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, कारण जयंतरावानी शिवारात पाणी आणले व संस्था चांगल्या चालवीत तुमचे जीवन समृद्ध केले आहे. त्यांच्या पाठीशी कायम उभा राहता, तसे भक्कम उभा राहा, असे आवाहन त्यांनी केले. जयंत पाटील म्हणाले, “भाजप- शिवसेनेचे सरकार हद्दपार करण्यासाठी मला राज्यात प्रचारासाठी फिरावे लागणार आहे. आपण मतदारसंघाची जबाबदारी अंगावर घेऊन कामाला लागा.
राज्यात आपले पुरोगामी, प्रगतशील सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अन्याय व युवकांची बेरोजगारी हटणार नाही. आपला उत्साह व संख्येवरून आपण एक लाख मताधिक्याच्या आसपास पोहचू, मात्र एक लाख पार करण्यासाठी घराघरापर्यंत पोहचा. निवडणुका झाल्या नंतर पुरग्रस्तांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी जोमाने काम करावे लागेल.” राजू शेट्टी म्हणाले, “”महापुराच्या काळात पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम जयंतराव व त्यांच्या कुटुंबांने केले. मात्र आमचे सरकार दमदार म्हणणाऱ्यांनी बोटी पोराबाळांच्या पर्यटनास वापरल्या. या फसव्या, भावनेशी खेळणाऱ्या सरकारला मतपेटीतून हिसका दाखवा.” अण्णासाहेब डांगे, दिलीपतात्या पाटील, आ. मोहनराव कदम यांची भाषणे झाली.
ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना धक्का
त्यांना या प्रकरणात क्लीन चीट देण्याचा निर्णयही सुप्रिम कोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज हा निर्णय देताना फडणवीसांवरील आरोपांच्या संबंधात रितसर खटल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सतिश उके यांनी त्यांच्या विरोधात ही याचिका केली आहे. सतिश उके यांनी दाखल केलेल्या तक्रारीची नव्याने दखल घेण्याची सुचना सुप्रिम कोर्टाने ट्रायल कोर्टाला दिली आहे. 1996 आणि 1998 मध्ये फडणवीस यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या संबंधात दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी सन 2014 च्या निवडणूक अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलमांनुसार हा गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्या अंतर्गत सहा महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
असली लय बघितली आहेत…
ईडीच्या कारवाई बाबत बोलताना पवार म्हणाले, “बापजन्मात मी कोणताही गुन्हा केला नाही. कोणत्याही सहकारी संस्थेचा संचालक नाही. मग माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता. ईडीला काय चौकशी करायची ती करू देत.’ असली लय बघितली आहेत, असा टोलाही सरकारला हाणला.