महादेव जाधव
कोंढवा – कोंढवा बुद्रुक येथील प्रभाग क्र.41 मध्ये विविध प्रकल्पांच्या इमारतींची उद्घाटने झाली आहेत. पण, 3-4 वर्षे होऊनही या सुविधा नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाने जनतेच्या भावनांशी खेळ न करता, ही विकासकामे व प्रकल्प तातडीने सुरू करावीत अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
1. भाजीमंडईची इमारत – भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी हक्काची जागा नव्हती. ते रस्त्यावर किंवा हातगाडीवर व्यवसाय करायचे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. तर दुसरीकडे तब्बल तीन कोटी सात लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीमंडईची इमारत तीन-चार वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही धूळखात पडली आहे. भाजीची एकही जुडी विक्री झालेली नसताना या इमारतीसमोर आता छोट्या टपऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
2. व्यायामशाळा- याच प्रभागात पुढे लोकनेते गोपीनाथ मुंडे व्यायाम शाळेची इमारतीचे उद्घाटन होऊन तीन वर्षे उलटली. तरीही ती सुरू करण्यात आलेली नाही. या इमारतीलाही कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती सुरू करण्यात वैयक्तिक हितसंबंध तर आड येत नाहीत ना?, मर्जीतील लोकांनाच गाळे व ठेके देण्या-घेण्यावरुन तर ही कामे मार्गी लागत नसतील ना? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
3. जलतरण तलाव – उन्हाळा संपत आला तरी कात्रज-कोंढवा मार्गावरील कै. विठ्ठलराव गेणुजी टिळेकर जलतरण तलावही अर्धवट अवस्थेत बंद पडला आहे. त्यामुळे नागरिकांना पोहण्यासाठी विहिरी व कालव्याकडे नाईलाजास्तव वळावे लागत आहे. तरीही पालिका प्रशासनाला जाग येत नाही. हा जलतरण तलाव लहान असला, तरी तो पूर्ण करुन नागरिकांना खुला करण्याची मागणी होत आहे.
4. स्मशानभूमी – अनेक वर्षांपासून स्थलांतराच्या प्रतीक्षेत असलेली स्मशानभूमी बाह्यवळण मार्गावर आहे. ती लहान असून, मुख्य रस्त्यालगतच उघड्यावर आहे. त्यामुळे अंत्याविधीवेळी वाहतुकीमुळे तेथे धोका निर्माण झाला आहे. खडीमशीन चौकातील नवीन स्मशानभूमीत पारंपरिक आणि विद्युतदाहिनीची सुविधा करण्यात येणार होती. पण, आता फक्त केवळ विद्युतदाहिनीच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय इतर अनेक विकासकामेही अर्धवट अथवा धूळखात पडले आहेत.