मुंबई – कुणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. अभिनेते सोनू सूद यांनी चांगलं काम केल्यानंतर ते भाजपचे आहेत, असं सांगितलं, त्याचा आम्हाला आनंद आहे. चांगलं काम करणारे भाजपमध्येच आहेत, हा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर सेनेच्या मुखपत्रातून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले. अखेर रविवारी (7 जून) रात्री सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूदवर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वत:च्या भरोश्यावर आणि हिंमतीवर समाजात कार्य केलं. या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही ज्यावेळी जलयुक्त शिवारचं कार्य करायचो, त्यावेळी नाम फाऊंडेशन, अभिनेता आमीर खानचं फाऊंडेशन काम करायचं. आम्ही त्यांचा हेवादावा कधी केला नाही. उलट त्यांना अधिक मदत कशी करता येईल, याचा विचार केला. कारण सरकारच्या कामात ते मदत करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक केलं, असं फडणवीस म्हणाले.
बीजीएस सारख्या संस्थेने चांगलं काम केलं. आम्ही त्यांचा हेवादावा नाही केला. उलट त्यांना अधिक मदत केली आणि त्यांची मदत घेतली. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं चुकीचं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.