वेल्हे – येथील भारत संचार निगम लिमिटेडचा सावळा कारभार समोर आला. वेल्हे येथील बीएसएनएलच्या कार्यालयाचे वीजबील 1 लाख 14 हजार रुपये थकले असल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडले आहे, अशी माहिती महावितरण शाखा अभियंता संतोष शिंदे यांनी दिली.
तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणांचे ऑनलाइन कामकाज भारत संचार निगम लिमीटेडवर अवलंबून आहे. त्यामुळे वरिष्ट कार्यालयास पाठवले जाणारे अहवाल रखडले जातात. गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यात बीएसएनएलची सेवा कोलमडलेली असून महिन्यातून केवळ आठ ते दहा दिवस रेंजची सेवा देत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह सामान्य जनता भरडली जात आहे. त्यातच महावितरणाचे वीजबील थकवल्याने महावितरणने वीज कनेक्शन तोडून बीएसएनएलला धक्का दिला आहे.
निसर्ग समृद्धी असलेल्या तालुक्याला बीएसएनएलच्या विस्काळीत सेवेच्या संकटाला संघर्ष करावा लागत आहे. वीज कनेक्शन तोडल्याने वेल्हे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आरोग्य सेवा आदींची ऑनलाइन सेवा बंद पडली आहे.
तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी महा ई सेवा केंद्रात मिळणाऱ्या कागदपत्रांसाठी रेंज नसल्याने पंधरा ते वीस किलोमीटरची पायपीट करून हेलपाटे मारावे लागत आहेत. खरेदी विक्रीचेही व्यवहार ठप्प पडल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंदच आहेत. त्यामुळे शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. बॅंकेत पैसेही काढता येत नाही. त्यामुळे वेल्ह्यातला सामान्यातला सामान्य माणूस म्हणतोय नको रे बाबा ते ऑनलाइन.. बिनलाइन…