अतिवृष्टीने हिरावले; कांद्याने निभावले
विशेषत: पुणे, जळगाव आणि कोल्हापूर प्रमाणेच कांद्याचे आगार म्हणून नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो. नाशिकच्या कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळत आहे. नाशिकचा नवीन कांदा बाजारात येऊ लागला असून लासलगावचा कांदा प्रती क्विंटल 4 हजार प्रमाणे तर कळवण कांदा तीन हजार आठशे रुपये प्रती क्विंटल दराप्रमाणे तर पिंपळगाव बसवंतचा कांदा 3 हजार 900 रुपये प्रती क्विंटल दराप्रमाणे विक्री होत आहे. पुणे विभागातील उत्पादित झालेल्या कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. जुन्या आणि नवीन उत्पादित झालेल्या कांद्याला चांगला आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत असला तरी कांद्याचे होणारे उत्पादन यंदा घटल्याचे चित्र पहावयास मिळते. कांद्याच्या बाजारभावाची स्थिती उपलब्धता कमी असल्याने चांगली आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदाची परिस्थिती पाहिली तर रब्बी हंगामात सध्या विक्रीसाठी नवीन उत्पादित झालेल्या कांद्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
-सागर थोरात, कांदा आडतदार.
रांजणी -चालू वर्षी कांदा सर्वार्थाने भारी ठरला आहे. नवीन कांद्याची आवक वाढू लागली असली तरी कांद्याचे बाजारभाव कमी होताना दिसून येत नाहीत. अर्थात शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही अत्यंत चांगली बाब आहे. कारण यंदा अतिवृष्टीने शेती पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात यंदा काहीच आर्थिक प्राप्ती आली नाही. किमान ज्या शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध आहे.
अशा शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चांगली आर्थिक प्राप्ती होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी खरीप हंगामात लावलेला कांदा आता काढणीस आला आहे. विविध बाजारपेठांमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी दाखलही होत आहे. परंतू कांद्याचे बाजारभाव अद्यापही टिकून आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषत: खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात चासकमान आणि डिंभे धरणाच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी बाहेरुन भरमसाठ किंमत मोजून कांद्याची रोपे खरेदी करुन शेतात कांद्याची लागवड केली आहे. मात्र प्राप्त परिस्थितीत ज्यांच्याकडे गेल्यावर्षी शिल्लक राहिलेला किंवा आरणीमध्ये साठवलेला कांदा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.
कांद्याच्या बाजारभावाची तुलना केली तर राज्यातील पुणे, नाशिक, लासलगाव आदी ठिकाणच्या कांद्याला सुमारे 50 ते 60 रुपये प्रती किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे दिसून येते.
उत्पादनाअभावी चिंतेचे सावट यंदाच्या रब्बी हंगामातील उत्पादित झालेल्या आणि बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरी कमी उत्पादन निघाल्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे सावट आहे. एवढे मात्र निश्चित आहे की, यंदा इतर पिकांच्या तुलनेत कांदा बाजारभावाच्या दृष्टीने भारी ठरतोय हे मात्र तितकेच खरे आहे.